...... रोग .....
कुर्रकुटूक..ssss
टोक्यातून कोंबड्याचा आवाज आला आणि जाग आली. कोंबडा दोन दिवस आरवलाच नव्हता.
परवा ह्यांनी फोन केलेला...
" गनपतीत काय मना ईयाला भेटत नाय, शेठ च्या घरी गनपती हाय दिड दिसाचा. तवा तो आटपला की मंगच ईन. बाबूला पन सुट्टी नाय भेटली तो पन दोन दिसाचा खाडा टाकून यल. गौरीला यवू दोन दिस, तिकीटा भेटलीत. कोंबडा हाय नं? "
आता त्यांना तरी कसं सांगायचं की इकडे कोंबड्यांचा रोग आलाय तो.
अंजूम च्या पोल्ट्रीमधल्या कोंबड्यांपासून पसरलेला हा रोग परिसरातल्या चारही गावात पसरला होता.
सकाळी चांगली असणारी कोंबडी दुपारी टुक टुक मान हलवत घरी यायची. रात्री टोक्यात झाकून ठेवली की सकाळी मान टाकलेली. एक एक करत प्रत्येक घरातली सगळी कोंबडी मेली.
मला सुगावा लागला तसा मोठा कोंबडा, वर माळ्यावर नेऊन ठेवला टोक्यासकट. चार कोंबड्या, दोन कोंबडे आणि सहा पिल्लं बघता बघता मेली.
घरातला सगळा किलकिलाटच बंद झाला. बाबू होता तोवर घरात घरपण होतं. त्याच्यामागे दिवस कसा जायचा तेच कळायचं नाही. तो मुंबईला गेला आणि मग घर खायला उठलं. बाबू आणि हे एकाच शेठकडे कामाला होते. हे शेठच्या घरी घरकामाला आणि बाबू शेठच्या कंपनीत. सणांमध्येच सुट्टी मिळायची. शिमग्याला दहा दिवस, गणपतीत पाच दिवस, आणि अधीमधी कधी दोन दोन दिवस. दोघेही कामाला असले तरी जुने कर्ज इतकं होतं कशी बशी हातातोंडाची गाठ पडत होती.
गावाला येताना दोन तीन हजार रुपये आणणार त्याच्यातच सण साजरा करायचा.
उसनवारी करुन सण साजरा करायला मलाही आवडायचं नाही. पण नाईलाज होता. एक वेळ गोडधोडासाठी लोकांकडे मागून मिळायचं, पण तिखट्या सणाला कोण देणार उसनवारीत?
जाग आली तशी जावून दरवाजा उघडला. रात्री साडेबाराची गाडी म्हणजे सकाळी सहा पर्यंत यायला हवे होते. घरासमोरची आकाबाय तांदूळ पाखडत होती. तिला विचारलं.
" काय गो आका..?
गाडी आंजून कशी नाय आली गो?"
आकाबाय म्हणाली.
" अगो.. रस्ता जाम खराब हाय. परत गेलंल्या यसट्या उशीरा जातात.. मंग तिकडून पन उशीर व्हतो.
यतील उशीरानं.. सुऱ्याचा फोन आलंला धा मिन्टांपुर्वी की मंदंनगडला पोचली यसटी म्हणून. "
" अस्सा काय? " मी आश्वासक पणे सुस्कारा सोडला. सुर्या आणि हे दोघं एकाच एसटीत होते.
मी भराभरा आटपायला घेतलं. पाऊण तासात पोचते एसटी गावात मंडणगडवरुन. चुल पेटवली. चुलीवर चहाची पितळी चढवली. आंधण येईस्तोवर आंघोळ वगैरे आटपली.
ह्यांच्या जुन्या घरात गौरी-गणपती. मोठे दिर पैसा राखून होते. त्यांनीच घर बांधून दिले. लहान भाऊ दारुडा असला तरी त्याला कधीही लांब केलं नव्हते. ही नोकरी पण त्याला त्यांनीच लावून दिली होती.
फक्त रविवारीच दारु प्यायची, ती सुद्धा थोडीशी.. उतरल्यावरच पुन्हा शेठच्या घरी तोवर गाववाल्यांच्या खोलीत राहायचे. अशी सक्त ताकीद देऊनच नोकरी दिली होती. बाबूची शाळा संपली तशी त्याला पण कंपनीत चिकटवलं.
पण गेल्यावर्षी जमीनीवरुन भांडणे झाली. मोठ्यांनी परस्पर एक जमीन विकली, यांची सही पण नाही घेतली. त्यावरुन भांडणे झाली. अजूनपर्यंत सर्व गोष्टीत सांभाळुन घेणारे दिर पुर्ण दुर्लक्ष करु लागले. एका तुकड्यावरुन ह्यांनी तरी दारु पिऊन नको तसं त्यांना बोलले. मी त्यांना समजवायला गेली तर मलाही मुस्कटात मारली सर्वांसमोर. शेवटी दिरांनी पाच हजार तोंडावर मारले तसे हे गप्प बसले. एकदा नात्यांना तडा गेला की पुन्हा तो भरुन निघत नाही हेच खरं.
" कुर्रकुटूक..ssss" माळ्यावरुन आवाज आला. तसे लक्ष त्या कोपर्यातल्या टोक्यांकडे गेले. सहा पिल्लांची कोंबडी पिल्लांसकट दोन दिवसात गेली. पहिल्या दिवशी संध्याकाळी आली तीच मान हलवत आली.. दोन पिल्लं रात्रीच दगावली. रात्री कोंबडीसुद्धा शांत झाली. उरलेली चार पिल्लं सकाळी पाय वर करुन मेलेली. दोन दिवसांत गावातली अर्धी अधिक कोंबडी मेली.
अशोक भावोजी सांगत होते की हा रोग अंजूम च्या पोल्ट्रीमधूनच आला. गावात कोणीतरी तिकडून आजारी कोंबडी जिवंत आणली असणार आणि किरकिंड्यात ठेवली असणार. तिच्यामुळे इतर कोंबड्या आणि त्यांच्यामुळे गावातल्या सगळ्या कोंबड्यांना लागण झाली.
परवा अंजूमच्या पोल्ट्रीवरुन गेली तेव्हा त्याच्या पोल्ट्रीत पण दहा बाराच कोंबड्या त्यासुद्धा मान डुलवणाऱ्या.
त्याला बोलताना ऐकलं
" यह बाकी मुर्गी मर जाएगी तो एक बार पावडर मारके पुरी पोल्ट्री साफ करवा लुंगा. दो हजार मुर्गियां दो दिन में मर गयी. बडा नुसकान हुवा. "
या रोगाने भरपूरच नुकसानी करुन ठेवली होती. रोगाचा अंदाज आला तसाच तो लाल तांबड्या पिसांचा मोठा कोंबडा पकडून माळ्यावर नेऊन टोक्यात बंद करुन ठेवला. उचलताना त्याचे वजन जाणवले. सहज चार साडेचार असेल. म्हणजे पिसं कमी केली तर तीन किलो कुठंच जात नाही. पण हा रोग त्याला लागायला नको. टोक्यात पण राखांडी टाकून ठेवली. टोक्याच्या आजूबाजूला पण पसरवून ठेवली. जेणे करुन रोग त्याच्याजवळ येऊ नये. सगळा दाणापाणी त्याला टोक्यातच.
घर कालच सारवलं होतं.
वाकणात एसटी आल्याचा आवाज आला. तसा चहाचा विस्तव कमी केला. पुढच्या दहा मिनीटात एसटी थांब्यावर पोचेल म्हणून भरभर दरवाजा बंद करुन थांब्यावर पोचले.
आकाबाय आलीच होती अगोदरच. एसटी थांबली. सुर्या उतरला त्याच्या मागून हे बॅग घेऊन. मागून बाबू खांद्यावर बोजा आणि हातात एक मोठी थैली घेऊन. मी झटकन पुढे जाऊन यांच्या हातातली बॅग घेतली यांनी परत जाऊन अजून एक बोजा गाडीतून काढला तो माझ्या डोक्यावर चढवला. हातातली बॅग पुन्हा स्वतःकडे घेतली.
" लय टाईम लागला. काय रस्ता खराब हाय म्हनून. हे डायवर लोक तरी काय करनार? एक एक हा हा खरडा. #तमारीच्या सरकारला गनपतीत तरी रस्त्या चांगला करायला काय होतं काय म्हाईत. सगल्या कडन्या दुखायला लागल्या. "
तोंडातून दारुचा भपकारा आला. बाबू पण दमल्यासारखाच दिसत होता.
" काय बाबू? बरा हास ना बावा? " मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.
" हो बरा हाय. " तुटकपणे बाबू बोलला.
" यवडा काय आनलाव ओ? दोन बोजे, बेगा ही पिसवी? " त्यांना विचारलं.
" शेठ च्या घरातलाच जुना सामान तो. शेटानी बोल्ली. हयता जुना सामान तू घेऊन जा. " हसत हसत ते म्हणाले.
यांनीच दरवाजाची कडी काढली, बाबूने ओटीवर चढून माझ्या डोक्यावरचा बोजा उतरवला.
...तोच
"होर.. होर.. हाट तिच्यामायला.. हाड... ssss तिच्यप.. "
यांचा आरडाओरडा.
" काय ओ... काय झाला. " मी घाबरुन विचारलं...
" अगो हा बघ काय.. बाऊल हाय वाटतं. " हे ओरडलेच.
" बाय गं... आपला कोंबडा वर होता माल्यावर. " धावतच दरवाजात आत गेली. वरुन लाल तांबडी पिसं पडत होती. फळीच्या फटीतून दोन चमकणारे डोळे क्षणभर दिसले.
कोंबड्यांच्या रोगापासून कोंबडयाला वाचवलं होतं पण गरीबीच्या रोगाने आम्हाला या परिस्थितीजनक उदमांजराने तिखट्या सणाला पार उपाशी करुन ठेवलं होतं.
कुर्रकुटूक..ssss
टोक्यातून कोंबड्याचा आवाज आला आणि जाग आली. कोंबडा दोन दिवस आरवलाच नव्हता.
परवा ह्यांनी फोन केलेला...
" गनपतीत काय मना ईयाला भेटत नाय, शेठ च्या घरी गनपती हाय दिड दिसाचा. तवा तो आटपला की मंगच ईन. बाबूला पन सुट्टी नाय भेटली तो पन दोन दिसाचा खाडा टाकून यल. गौरीला यवू दोन दिस, तिकीटा भेटलीत. कोंबडा हाय नं? "
आता त्यांना तरी कसं सांगायचं की इकडे कोंबड्यांचा रोग आलाय तो.
अंजूम च्या पोल्ट्रीमधल्या कोंबड्यांपासून पसरलेला हा रोग परिसरातल्या चारही गावात पसरला होता.
सकाळी चांगली असणारी कोंबडी दुपारी टुक टुक मान हलवत घरी यायची. रात्री टोक्यात झाकून ठेवली की सकाळी मान टाकलेली. एक एक करत प्रत्येक घरातली सगळी कोंबडी मेली.
मला सुगावा लागला तसा मोठा कोंबडा, वर माळ्यावर नेऊन ठेवला टोक्यासकट. चार कोंबड्या, दोन कोंबडे आणि सहा पिल्लं बघता बघता मेली.
घरातला सगळा किलकिलाटच बंद झाला. बाबू होता तोवर घरात घरपण होतं. त्याच्यामागे दिवस कसा जायचा तेच कळायचं नाही. तो मुंबईला गेला आणि मग घर खायला उठलं. बाबू आणि हे एकाच शेठकडे कामाला होते. हे शेठच्या घरी घरकामाला आणि बाबू शेठच्या कंपनीत. सणांमध्येच सुट्टी मिळायची. शिमग्याला दहा दिवस, गणपतीत पाच दिवस, आणि अधीमधी कधी दोन दोन दिवस. दोघेही कामाला असले तरी जुने कर्ज इतकं होतं कशी बशी हातातोंडाची गाठ पडत होती.
गावाला येताना दोन तीन हजार रुपये आणणार त्याच्यातच सण साजरा करायचा.
उसनवारी करुन सण साजरा करायला मलाही आवडायचं नाही. पण नाईलाज होता. एक वेळ गोडधोडासाठी लोकांकडे मागून मिळायचं, पण तिखट्या सणाला कोण देणार उसनवारीत?
जाग आली तशी जावून दरवाजा उघडला. रात्री साडेबाराची गाडी म्हणजे सकाळी सहा पर्यंत यायला हवे होते. घरासमोरची आकाबाय तांदूळ पाखडत होती. तिला विचारलं.
" काय गो आका..?
गाडी आंजून कशी नाय आली गो?"
आकाबाय म्हणाली.
" अगो.. रस्ता जाम खराब हाय. परत गेलंल्या यसट्या उशीरा जातात.. मंग तिकडून पन उशीर व्हतो.
यतील उशीरानं.. सुऱ्याचा फोन आलंला धा मिन्टांपुर्वी की मंदंनगडला पोचली यसटी म्हणून. "
" अस्सा काय? " मी आश्वासक पणे सुस्कारा सोडला. सुर्या आणि हे दोघं एकाच एसटीत होते.
मी भराभरा आटपायला घेतलं. पाऊण तासात पोचते एसटी गावात मंडणगडवरुन. चुल पेटवली. चुलीवर चहाची पितळी चढवली. आंधण येईस्तोवर आंघोळ वगैरे आटपली.
ह्यांच्या जुन्या घरात गौरी-गणपती. मोठे दिर पैसा राखून होते. त्यांनीच घर बांधून दिले. लहान भाऊ दारुडा असला तरी त्याला कधीही लांब केलं नव्हते. ही नोकरी पण त्याला त्यांनीच लावून दिली होती.
फक्त रविवारीच दारु प्यायची, ती सुद्धा थोडीशी.. उतरल्यावरच पुन्हा शेठच्या घरी तोवर गाववाल्यांच्या खोलीत राहायचे. अशी सक्त ताकीद देऊनच नोकरी दिली होती. बाबूची शाळा संपली तशी त्याला पण कंपनीत चिकटवलं.
पण गेल्यावर्षी जमीनीवरुन भांडणे झाली. मोठ्यांनी परस्पर एक जमीन विकली, यांची सही पण नाही घेतली. त्यावरुन भांडणे झाली. अजूनपर्यंत सर्व गोष्टीत सांभाळुन घेणारे दिर पुर्ण दुर्लक्ष करु लागले. एका तुकड्यावरुन ह्यांनी तरी दारु पिऊन नको तसं त्यांना बोलले. मी त्यांना समजवायला गेली तर मलाही मुस्कटात मारली सर्वांसमोर. शेवटी दिरांनी पाच हजार तोंडावर मारले तसे हे गप्प बसले. एकदा नात्यांना तडा गेला की पुन्हा तो भरुन निघत नाही हेच खरं.
" कुर्रकुटूक..ssss" माळ्यावरुन आवाज आला. तसे लक्ष त्या कोपर्यातल्या टोक्यांकडे गेले. सहा पिल्लांची कोंबडी पिल्लांसकट दोन दिवसात गेली. पहिल्या दिवशी संध्याकाळी आली तीच मान हलवत आली.. दोन पिल्लं रात्रीच दगावली. रात्री कोंबडीसुद्धा शांत झाली. उरलेली चार पिल्लं सकाळी पाय वर करुन मेलेली. दोन दिवसांत गावातली अर्धी अधिक कोंबडी मेली.
अशोक भावोजी सांगत होते की हा रोग अंजूम च्या पोल्ट्रीमधूनच आला. गावात कोणीतरी तिकडून आजारी कोंबडी जिवंत आणली असणार आणि किरकिंड्यात ठेवली असणार. तिच्यामुळे इतर कोंबड्या आणि त्यांच्यामुळे गावातल्या सगळ्या कोंबड्यांना लागण झाली.
परवा अंजूमच्या पोल्ट्रीवरुन गेली तेव्हा त्याच्या पोल्ट्रीत पण दहा बाराच कोंबड्या त्यासुद्धा मान डुलवणाऱ्या.
त्याला बोलताना ऐकलं
" यह बाकी मुर्गी मर जाएगी तो एक बार पावडर मारके पुरी पोल्ट्री साफ करवा लुंगा. दो हजार मुर्गियां दो दिन में मर गयी. बडा नुसकान हुवा. "
या रोगाने भरपूरच नुकसानी करुन ठेवली होती. रोगाचा अंदाज आला तसाच तो लाल तांबड्या पिसांचा मोठा कोंबडा पकडून माळ्यावर नेऊन टोक्यात बंद करुन ठेवला. उचलताना त्याचे वजन जाणवले. सहज चार साडेचार असेल. म्हणजे पिसं कमी केली तर तीन किलो कुठंच जात नाही. पण हा रोग त्याला लागायला नको. टोक्यात पण राखांडी टाकून ठेवली. टोक्याच्या आजूबाजूला पण पसरवून ठेवली. जेणे करुन रोग त्याच्याजवळ येऊ नये. सगळा दाणापाणी त्याला टोक्यातच.
घर कालच सारवलं होतं.
वाकणात एसटी आल्याचा आवाज आला. तसा चहाचा विस्तव कमी केला. पुढच्या दहा मिनीटात एसटी थांब्यावर पोचेल म्हणून भरभर दरवाजा बंद करुन थांब्यावर पोचले.
आकाबाय आलीच होती अगोदरच. एसटी थांबली. सुर्या उतरला त्याच्या मागून हे बॅग घेऊन. मागून बाबू खांद्यावर बोजा आणि हातात एक मोठी थैली घेऊन. मी झटकन पुढे जाऊन यांच्या हातातली बॅग घेतली यांनी परत जाऊन अजून एक बोजा गाडीतून काढला तो माझ्या डोक्यावर चढवला. हातातली बॅग पुन्हा स्वतःकडे घेतली.
" लय टाईम लागला. काय रस्ता खराब हाय म्हनून. हे डायवर लोक तरी काय करनार? एक एक हा हा खरडा. #तमारीच्या सरकारला गनपतीत तरी रस्त्या चांगला करायला काय होतं काय म्हाईत. सगल्या कडन्या दुखायला लागल्या. "
तोंडातून दारुचा भपकारा आला. बाबू पण दमल्यासारखाच दिसत होता.
" काय बाबू? बरा हास ना बावा? " मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.
" हो बरा हाय. " तुटकपणे बाबू बोलला.
" यवडा काय आनलाव ओ? दोन बोजे, बेगा ही पिसवी? " त्यांना विचारलं.
" शेठ च्या घरातलाच जुना सामान तो. शेटानी बोल्ली. हयता जुना सामान तू घेऊन जा. " हसत हसत ते म्हणाले.
यांनीच दरवाजाची कडी काढली, बाबूने ओटीवर चढून माझ्या डोक्यावरचा बोजा उतरवला.
...तोच
"होर.. होर.. हाट तिच्यामायला.. हाड... ssss तिच्यप.. "
यांचा आरडाओरडा.
" काय ओ... काय झाला. " मी घाबरुन विचारलं...
" अगो हा बघ काय.. बाऊल हाय वाटतं. " हे ओरडलेच.
" बाय गं... आपला कोंबडा वर होता माल्यावर. " धावतच दरवाजात आत गेली. वरुन लाल तांबडी पिसं पडत होती. फळीच्या फटीतून दोन चमकणारे डोळे क्षणभर दिसले.
कोंबड्यांच्या रोगापासून कोंबडयाला वाचवलं होतं पण गरीबीच्या रोगाने आम्हाला या परिस्थितीजनक उदमांजराने तिखट्या सणाला पार उपाशी करुन ठेवलं होतं.
No comments:
Post a Comment