.... विसर्जन ....
श्रावण संपत आला की गणेशोत्सवाचे वेध लागायचे. आम्ही शाळेत असताना कांदेवाडीतून जाताना गणपतीचे कारखाना दिसायचा. त्यातल्या गणपतीची विविध रंग आणि रुपे बघून आपल्याही घरी गणपती का आणत नाही असे प्रश्न घरी आई बाबांना आम्ही भावंडे टाकत असू. पण त्यांची समर्पक उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाही. गावच्या मुख्य घरात काकांकडे गणपती असतो म्हणून आपण आणत नाही. हे उत्तर तेव्हा आम्हाला पटायचंच नाही. नंतर नंतर कळलं की गणपतीची पुजा त्याची स्थापना वगैरे जरा कठीण काम आहे. शिवाय वडील सामाजिक कार्यात असल्याने तेवढा वेळ ते देऊ शकत नव्हते. म्हणून गणपती आमच्याकडे आलाच नाही.
आर्यन शाळेत असताना आम्हाला गणपतीची मोठी सुट्टी असायची. म्हणजे गणेश चतुर्थी ते गौरी पुजनापर्यंत, नंतर पुन्हा अनंत चतुर्दशीला.
या सुट्टीत अभ्यास सुद्धा असायचा. वहीत पेपर मधे आलेले गणपती, रंगीत काळे पांढरे, जाहीरातीतले असे ३० -४० गणपती चिकटवायचे, दिलेला अभ्यास उजव्या पानावर आणि गणपती डाव्या पानावर. सुट्टी गणपती शोधण्यातच संपून जायची. तेव्हा सार्वजनिक म्हणावा तर गिरगावचा राजा ( निकदवरी लेन) हा एकच प्रसिद्ध. त्यावेळी नळबाजारात राहत असल्याने केशवजी नाईकांच्या चाळीच्या बाजूने येत असू, गौरी पुजनानंतर शाळा सुरु झाली की रोज सकाळ दुपार मिळेल त्या गणपतीच्या मंडपात जाऊन साखरफुटाणे जमवत फिरणे हा गणपतीतला आवडता छंद.
गिरगावचा राजा तर दिवसातून दोनदा पाहीलाच जायचा. शिवाय पैसे जमवून त्या मंडळाची लॉटरी सुद्धा काढायचो आम्ही तिन्ही भावंडे. काही मिळालं तर ठिक नाहीतर देवाला पैसे हा सरळ साधा हिशोब. माझी नजर तर त्या बक्षिसातल्या सायकल वरच असायची. आता हा प्रकार बंद झालाय पण शेवटचे तिकीट जेव्हा काढले होते तेव्हा नजर पल्सर बाईक वर होती माझी.
गणपतीतले ९ दिवस संपल्यावर अनंतचतुर्दशीच्या आदल्या रात्री दरवर्षी आम्ही गावी जायचो.....
विसर्जनाला.
वडील तालुक्यातील समाजसंस्थेचे मुंबईचे अध्यक्ष असल्याने दरवर्षी सहकुटूंब सहपरिवार गावी जातच असत. समाजाची एक भव्य वास्तू आहे मंडणगड शहरात, तिथे सार्वजनिक गणपती असतो. त्याच्या विसर्जनाला आम्ही जायचो.
हा गणपती तालुक्यातल्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम करणारा गणपती आहे.
आम्ही तेव्हा लहानच. एक मारुती ओम्नी आम्हाला पुरायची. गाडीच्या डिकीत गुलालाच्या दोन गोणी, फटाक्यांची एक पिशवी आणि साखरफुटाण्यांची एक पिशवी असायची. रात्री गावी पोहचलो की सकाळीच तालुक्याला यावे लागायचे. विसर्जन मिरवणूक दहा वाजता सुरु व्हायची. मुंबईवरुन निघतानाच गाडीत गणपतीच्या गाण्यांच्या कॅसेट जमवून न्यायचो आम्ही. नसली तर नविन विकत सुद्धा घ्यायला लावायचो बाबांना. गाडीत गणपतीची गाणी वाजलीच पाहीजे हा अट्टाहास तेव्हा असायचाच. आमचे ड्रायवरकाकासुद्धा हरहुन्नरी होते. मंगेश काका... ते वरती गाडीच्या कॅरिअर वर मोठाले भोंगे आणून लावत कुठूनतरी. गाण्याचा आवाज गाडीतच नाही तर.. पार दोन चार गावापर्यंत जायचा.
बरोबर नऊ वाजता आम्ही गणपतीसमोर असू. अध्यक्षांची मुलं म्हणून आमच्या वर सर्वच लाड करत. आमचीही कॉलर ताठ असे.
आरती झाली की गणपती उचलला जाई. कुणबी भवनातून टेंपोमध्ये आणायलाच वीस मिनटं लागत. तेव्हा गणपती पुर्ण मातीचा असल्याने जड असायचा. एकदा का टेंपोत गणपती चढवला की हजारची माळ लावण्याची ऑर्डर बाबांकडून यायची. मग एका हातात अगरबत्ती आणि दुसऱ्या हातात माळेचा बॉक्स घेऊन आम्ही दोघं भाऊ थेट रस्त्यावर जायचो. मध्ये मध्ये ऍटम बॉम्ब पेरुन ती माळ पेटवली की अख्ख्या मंडणगडला कळायचं की " कुणबी भवनचा राजा " निघाला. दोन ट्रक भरतील एवढी पुरुष मंडळी आणि एक ट्रक महिला मंडळ एवढी लोक असायची आमच्या गाडीतही दहा बारा लोक असायची. गुलालाची एक गोणी गणपतीच्या टेंपोत दिलेली असायची. गणपती रस्त्यावर येईपर्यंतच सर्व लोक गुलालाने माखले जायचे.
" अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं " हे उत्तरा केळकरांच्या आवाजातलं गाणं तर त्यावेळी सर्वच गणपती असलेल्या घरांत, मंडपात वाजायचे. पुर्ण कॅसेटच अप्रतिम अशी होती. मंडणगड शहरातून ही विसर्जन मिरवणूक थेट वीस किलोमीटर असलेल्या नदीवर संपन्न व्हायची.
वाटेत लागणाऱ्या महत्वाच्या गावांमध्ये गणेशाचे पुजन केले जायचे. गाववाल्यांकडून लोकांना फराळ, चहा वगैरेची व्यवस्था असायची. सर्वात पुढे आमची गाडी असायची..
कारण फटाके आम्हीच लावत असल्याने.. आम्हीच पुढे. फटाक्यांचा आवाज आला की गावातली सर्व लोकं गणपतीदर्शनाला येत असत. गणपती मिरवणूकीत सनई, ढोल, टिमकी अशी पारंपारिक वाद्य असत सोबतच बुलबुल तरंग मिरवणूकीची शोभा वाढवे. गावाजवळ मिरवणूक थांबली की एका क्षणात तिन्ही टेंपो रिकामे होत आणि सर्व नाचायला येत. सोबत त्या त्या गावातली लोकं सुद्धा. पहीला स्टॉप पाच किलोमीटर वर तुळशी गावातच असे. मंडणगडचा घाट उतरला की तुळशी गाव. गावातून जोडरस्ता असल्याने मिरवणूक थेट गावातल्या रस्त्यानेच जाते. तिथे सुद्धा एक हजारची माळ लावण्याची ऑर्डर यायची सोबत ऍटम बॉम्ब सुद्धा सुरुच असायचे. गुलालाने माखलेले सर्व लोक खुप नाचायचे. काकड्या, केळी, मोसंबी, सफरचंद असा पोटभर प्रसाद खाऊन झाला की मिरवणूक पुढे निघे.
पुढचे गाव पाले. पाले गावात सुद्धा भरपूर प्रसाद मिळे. तिथेही नाचून लोक दमत. लोकांना सांगावे लागे की चला आता पुढे.. आपल्याला पुढे खुप जायचंय.
गणपती बाप्पा मोरया..
कुणबी भवनच्या राजाचा विजय असो..
अशा दणादणून सोडणाऱ्या घोषणांसोबतच आणि फटाकांच्या आवाजासोबत मिरवणूक देव्हारे गावात पोहोचे. देव्हारे हे या रस्त्यावरचे सर्वात जास्त गावं असलेले पोस्ट आहे. तिथे बाजारपेठही आहे. शिवेवरच हजाराची माळ आणि ऍटम बॉम्ब चा दणका आम्ही दोघं भाऊ उडवून देत असू.
" बंधू येईल माहेरी न्यायला.. गौरी गणपतीच्या सणाला "
या गाण्यासोबतच आमची ओम्नी सर्वात पहिली गावात घूसे. मुख्य बाजारपेठेत धडामधूम केल्यावर संपूर्ण देव्हारे आणि आजूबाजूच्या परिसरातील गावातले लोक राजाच्या दर्शनाला येत. इथे येई पर्यंत गुलालाची एक गोणी संपलेली असे मग अर्धी गोणी पुन्हा टेंपोत जायची आमच्या गाडीतून.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गुलालाची बरसात व्हायची. सर्व आनंदाने यात सहभागी व्हायचे. तरुण- तरुणी, लहान - म्हातारे सर्व समरसून विसर्जन सोहळा जगायचे. कित्येक लग्न या विसर्जन सोहळ्यातच जुळली असतील. देव्हारे गावात दोन तास तरी जायचे. खाणं पिणं खुप व्हायचे इथं.
पुढे मालेगांव, नायणे, गोकूळगाव, अशी छोटी मोठी गावं करत मिरवणूक सहा साडेसहा पर्यंत चिंचघरच्या नदीवर पोहचायची. राहीलेले फटाके आणि गुलाल या नदिवरच संपायचा.
गणपतीची आरती झाली की गावातले तरुण गणपतीला विसर्जनाला न्यायचे. इतर कोणाला परवानगी नसायची. नदि खोल आणि वेगवान वाहणारी आहे. ...
" आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची... स्वारी निघाली निघाली गणपती रायाची "
या गाण्याचे सुर आमच्या ओम्नी वरच्या भोंग्यावरुन येत असताना......हळू हळू डोळ्यातुन अश्रू कधी वाहायला लागत ते कळायचे नाहीत.
- बिझ सं जय ( १५ सप्टेंबर, २०१६)
श्रावण संपत आला की गणेशोत्सवाचे वेध लागायचे. आम्ही शाळेत असताना कांदेवाडीतून जाताना गणपतीचे कारखाना दिसायचा. त्यातल्या गणपतीची विविध रंग आणि रुपे बघून आपल्याही घरी गणपती का आणत नाही असे प्रश्न घरी आई बाबांना आम्ही भावंडे टाकत असू. पण त्यांची समर्पक उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाही. गावच्या मुख्य घरात काकांकडे गणपती असतो म्हणून आपण आणत नाही. हे उत्तर तेव्हा आम्हाला पटायचंच नाही. नंतर नंतर कळलं की गणपतीची पुजा त्याची स्थापना वगैरे जरा कठीण काम आहे. शिवाय वडील सामाजिक कार्यात असल्याने तेवढा वेळ ते देऊ शकत नव्हते. म्हणून गणपती आमच्याकडे आलाच नाही.
आर्यन शाळेत असताना आम्हाला गणपतीची मोठी सुट्टी असायची. म्हणजे गणेश चतुर्थी ते गौरी पुजनापर्यंत, नंतर पुन्हा अनंत चतुर्दशीला.
या सुट्टीत अभ्यास सुद्धा असायचा. वहीत पेपर मधे आलेले गणपती, रंगीत काळे पांढरे, जाहीरातीतले असे ३० -४० गणपती चिकटवायचे, दिलेला अभ्यास उजव्या पानावर आणि गणपती डाव्या पानावर. सुट्टी गणपती शोधण्यातच संपून जायची. तेव्हा सार्वजनिक म्हणावा तर गिरगावचा राजा ( निकदवरी लेन) हा एकच प्रसिद्ध. त्यावेळी नळबाजारात राहत असल्याने केशवजी नाईकांच्या चाळीच्या बाजूने येत असू, गौरी पुजनानंतर शाळा सुरु झाली की रोज सकाळ दुपार मिळेल त्या गणपतीच्या मंडपात जाऊन साखरफुटाणे जमवत फिरणे हा गणपतीतला आवडता छंद.
गिरगावचा राजा तर दिवसातून दोनदा पाहीलाच जायचा. शिवाय पैसे जमवून त्या मंडळाची लॉटरी सुद्धा काढायचो आम्ही तिन्ही भावंडे. काही मिळालं तर ठिक नाहीतर देवाला पैसे हा सरळ साधा हिशोब. माझी नजर तर त्या बक्षिसातल्या सायकल वरच असायची. आता हा प्रकार बंद झालाय पण शेवटचे तिकीट जेव्हा काढले होते तेव्हा नजर पल्सर बाईक वर होती माझी.
गणपतीतले ९ दिवस संपल्यावर अनंतचतुर्दशीच्या आदल्या रात्री दरवर्षी आम्ही गावी जायचो.....
विसर्जनाला.
वडील तालुक्यातील समाजसंस्थेचे मुंबईचे अध्यक्ष असल्याने दरवर्षी सहकुटूंब सहपरिवार गावी जातच असत. समाजाची एक भव्य वास्तू आहे मंडणगड शहरात, तिथे सार्वजनिक गणपती असतो. त्याच्या विसर्जनाला आम्ही जायचो.
हा गणपती तालुक्यातल्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम करणारा गणपती आहे.
आम्ही तेव्हा लहानच. एक मारुती ओम्नी आम्हाला पुरायची. गाडीच्या डिकीत गुलालाच्या दोन गोणी, फटाक्यांची एक पिशवी आणि साखरफुटाण्यांची एक पिशवी असायची. रात्री गावी पोहचलो की सकाळीच तालुक्याला यावे लागायचे. विसर्जन मिरवणूक दहा वाजता सुरु व्हायची. मुंबईवरुन निघतानाच गाडीत गणपतीच्या गाण्यांच्या कॅसेट जमवून न्यायचो आम्ही. नसली तर नविन विकत सुद्धा घ्यायला लावायचो बाबांना. गाडीत गणपतीची गाणी वाजलीच पाहीजे हा अट्टाहास तेव्हा असायचाच. आमचे ड्रायवरकाकासुद्धा हरहुन्नरी होते. मंगेश काका... ते वरती गाडीच्या कॅरिअर वर मोठाले भोंगे आणून लावत कुठूनतरी. गाण्याचा आवाज गाडीतच नाही तर.. पार दोन चार गावापर्यंत जायचा.
बरोबर नऊ वाजता आम्ही गणपतीसमोर असू. अध्यक्षांची मुलं म्हणून आमच्या वर सर्वच लाड करत. आमचीही कॉलर ताठ असे.
आरती झाली की गणपती उचलला जाई. कुणबी भवनातून टेंपोमध्ये आणायलाच वीस मिनटं लागत. तेव्हा गणपती पुर्ण मातीचा असल्याने जड असायचा. एकदा का टेंपोत गणपती चढवला की हजारची माळ लावण्याची ऑर्डर बाबांकडून यायची. मग एका हातात अगरबत्ती आणि दुसऱ्या हातात माळेचा बॉक्स घेऊन आम्ही दोघं भाऊ थेट रस्त्यावर जायचो. मध्ये मध्ये ऍटम बॉम्ब पेरुन ती माळ पेटवली की अख्ख्या मंडणगडला कळायचं की " कुणबी भवनचा राजा " निघाला. दोन ट्रक भरतील एवढी पुरुष मंडळी आणि एक ट्रक महिला मंडळ एवढी लोक असायची आमच्या गाडीतही दहा बारा लोक असायची. गुलालाची एक गोणी गणपतीच्या टेंपोत दिलेली असायची. गणपती रस्त्यावर येईपर्यंतच सर्व लोक गुलालाने माखले जायचे.
" अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं " हे उत्तरा केळकरांच्या आवाजातलं गाणं तर त्यावेळी सर्वच गणपती असलेल्या घरांत, मंडपात वाजायचे. पुर्ण कॅसेटच अप्रतिम अशी होती. मंडणगड शहरातून ही विसर्जन मिरवणूक थेट वीस किलोमीटर असलेल्या नदीवर संपन्न व्हायची.
वाटेत लागणाऱ्या महत्वाच्या गावांमध्ये गणेशाचे पुजन केले जायचे. गाववाल्यांकडून लोकांना फराळ, चहा वगैरेची व्यवस्था असायची. सर्वात पुढे आमची गाडी असायची..
कारण फटाके आम्हीच लावत असल्याने.. आम्हीच पुढे. फटाक्यांचा आवाज आला की गावातली सर्व लोकं गणपतीदर्शनाला येत असत. गणपती मिरवणूकीत सनई, ढोल, टिमकी अशी पारंपारिक वाद्य असत सोबतच बुलबुल तरंग मिरवणूकीची शोभा वाढवे. गावाजवळ मिरवणूक थांबली की एका क्षणात तिन्ही टेंपो रिकामे होत आणि सर्व नाचायला येत. सोबत त्या त्या गावातली लोकं सुद्धा. पहीला स्टॉप पाच किलोमीटर वर तुळशी गावातच असे. मंडणगडचा घाट उतरला की तुळशी गाव. गावातून जोडरस्ता असल्याने मिरवणूक थेट गावातल्या रस्त्यानेच जाते. तिथे सुद्धा एक हजारची माळ लावण्याची ऑर्डर यायची सोबत ऍटम बॉम्ब सुद्धा सुरुच असायचे. गुलालाने माखलेले सर्व लोक खुप नाचायचे. काकड्या, केळी, मोसंबी, सफरचंद असा पोटभर प्रसाद खाऊन झाला की मिरवणूक पुढे निघे.
पुढचे गाव पाले. पाले गावात सुद्धा भरपूर प्रसाद मिळे. तिथेही नाचून लोक दमत. लोकांना सांगावे लागे की चला आता पुढे.. आपल्याला पुढे खुप जायचंय.
गणपती बाप्पा मोरया..
कुणबी भवनच्या राजाचा विजय असो..
अशा दणादणून सोडणाऱ्या घोषणांसोबतच आणि फटाकांच्या आवाजासोबत मिरवणूक देव्हारे गावात पोहोचे. देव्हारे हे या रस्त्यावरचे सर्वात जास्त गावं असलेले पोस्ट आहे. तिथे बाजारपेठही आहे. शिवेवरच हजाराची माळ आणि ऍटम बॉम्ब चा दणका आम्ही दोघं भाऊ उडवून देत असू.
" बंधू येईल माहेरी न्यायला.. गौरी गणपतीच्या सणाला "
या गाण्यासोबतच आमची ओम्नी सर्वात पहिली गावात घूसे. मुख्य बाजारपेठेत धडामधूम केल्यावर संपूर्ण देव्हारे आणि आजूबाजूच्या परिसरातील गावातले लोक राजाच्या दर्शनाला येत. इथे येई पर्यंत गुलालाची एक गोणी संपलेली असे मग अर्धी गोणी पुन्हा टेंपोत जायची आमच्या गाडीतून.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गुलालाची बरसात व्हायची. सर्व आनंदाने यात सहभागी व्हायचे. तरुण- तरुणी, लहान - म्हातारे सर्व समरसून विसर्जन सोहळा जगायचे. कित्येक लग्न या विसर्जन सोहळ्यातच जुळली असतील. देव्हारे गावात दोन तास तरी जायचे. खाणं पिणं खुप व्हायचे इथं.
पुढे मालेगांव, नायणे, गोकूळगाव, अशी छोटी मोठी गावं करत मिरवणूक सहा साडेसहा पर्यंत चिंचघरच्या नदीवर पोहचायची. राहीलेले फटाके आणि गुलाल या नदिवरच संपायचा.
गणपतीची आरती झाली की गावातले तरुण गणपतीला विसर्जनाला न्यायचे. इतर कोणाला परवानगी नसायची. नदि खोल आणि वेगवान वाहणारी आहे. ...
" आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची... स्वारी निघाली निघाली गणपती रायाची "
या गाण्याचे सुर आमच्या ओम्नी वरच्या भोंग्यावरुन येत असताना......हळू हळू डोळ्यातुन अश्रू कधी वाहायला लागत ते कळायचे नाहीत.
- बिझ सं जय ( १५ सप्टेंबर, २०१६)
No comments:
Post a Comment