Thursday, 10 November 2016

एकुलता एक

.... एकुलता एक  ....


" ए...  बाळा...  लागला का रे काही पत्ता दत्तूचा? " म्हाताऱ्या जनीबाई ने कसा बसा फोन कानाला लावत समोर मुंबईला असणाऱ्या बाळारामला विचारले.

" आत्त्ये,  नाही अजून तरी नाही, मी काढतोय माहीती. रविवारी दिसला होता तेवढाच, नंतर गायबच झालाय.  फोन सुद्धा बंद येतोय त्याचा.  मी कळवतो तुला.  आज पोलिसांनी बोलावलेय जेजे ला. लागला पत्ता तर सांगेन कुंदाकडे फोन करुन " एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला.

जनीबाईने फाटक्या पदराने डोळे पुसले आणि ती कुंदेच्या घरुन निघाली, तेवढ्यात मागून कुंदाने हाक मारली.
" आत्ये.  का एवढी काळजी करतेस.  इथून भांडून गेल्यावर एकदा तरी आलाय का दत्तू इकडे?  तुला टाकूनच दिलंय त्याने.  म्हातारी जिवंत आहे की मेलीय हे तरी माहीत आहे का त्याला?  " कुंदा जरा चिडूनच बोलत होती.

" हो गं कुंदे...  पण शेवटी तो माझा एकुलता एक मुलगा आहे गं..  तो विसरला तरी मी विसरणार आहे का?  " जनीबाई आढ्याकडे पाहत म्हणाली.

" आत्ये,  तू नाही सुधारणार, दत्तू  कंबरेत लाथ घालून गेला तेव्हाही तू अशीच होतीस. तुला सांगून काही फरक नाही,  जा तू आता घरी,  जेवण घेऊन येते मी  " कुंदा चरफडत होती.
जनीबाई हळू हळू काठी टेकत घराच्या पायऱ्या उतरुन स्वतःच्या घरी गेली.
घरी जाऊन तिने मोडका दरवाजा बंद केला आणि इतका वेळ दाबून ठेवलेले रडू फुटले. तिला 'तो' दिवस आठवायला लागला.

दत्तू त्यादिवशी भरपूर पिऊन आला होता. आल्या आल्या त्याने दरवाजावरच लाथ मारली,  घाणेरडी शिवी देत म्हणाला...
" आये...  तू अंगठा देणार की नाही?  मी लास्ट टाईम विचारतोय तुला,  तो दलाल मला म्हणाला की नसेल विकायची तर बयाना परत दे. " त्याच्या डोळ्यात अंगार होता.

" ए बाळा..  तू राग नको करु रे..
सर्व जमिनी विकल्या तर उद्या खायचं काय रे?  आधीच त्या जमिनी कशा बशा सोडवल्या होत्या तुझ्या बाबांनी सावकारांकडून. ते गेले आणि तू एक एक करुन या दारुच्या नादात विकायला लागलास,  ही शेवटची आहे..  कुंदाला अर्धेलीवर दिलीय म्हणून घरात अन्न तरी येतंय,  तू तर काही कमवत नाहीस,  मजूरी करतोयस ती सुद्धा दारुवरच संपवतोस तू.  मी नाही देणार अंगठा वगैरे " जनीबाई निर्वाणीच्या सुरात बोलली.

तिचा तो सूर ऐकून याची दारु आणखीनच चढली.  दलालाला पन्नास हजार कुठून द्यायचे याची चिंता त्याच्यातला जनावर बाहेर काढत होते.
काय करु..  काय करु...  असा विचार करुन काही न सुचल्याने  त्याने समोर असलेल्या मडक्याला लाथ मारली.  मातीच मडकं फुटलं.  घरभर पाणी झालं.

" ए बाळा काय करतो रे. का म्हणून नुकसान करतो? वेडा झालास का?   " घाबरलेली जनीबाई पटकन बोलली.

" म्हातारे...  मला वेडा म्हणतेस?  तिच्या आयला..  जमीन विक सांगतो तर अंगठा देत नाही.  वर माझ्यावरच आवाज.  मी जातो आता सोडून गाव.  तू बस त्या जमीनीवर अंडी उबवत.  "
एवढं बोलून त्याने पिशवी भरायला सुरुवात केली.

" बाळा नको रे असं करु..  कुठं जातोस आता?  तु गेल्यावर या म्हातारीने करायचं तरी काय?  अरे तू एकुलता एक मुलगा आहेस माझा. " रडत रडत जनीबाई त्याला समजावत होती.

आवाज ऐकून समोरच्याच घरातली कुंदा तिच्या दरवाज्यातून पाहू लागली.

पिशवी भरुन दत्तू निघाला तसा जनीबाईचा धीर सुटला.
तिने त्याला अडवायला त्याचे पाय धरले. परंतू डोक्यात दारुची नशा भिनलेल्या दत्तूने पटकन तिला सणसणीत लाथ घातली.
" जा मर तिकडे..  मी चाललो मुंबईला.  तिकडे काय पण करेन,  पुन्हा इकडे येणार नाही.  आज पासून तू मला मेलीस आणि मी तुला.  घेऊन बस ती जमीन उरावर ".
मागे न पाहता तो तसाच चालू पडला एसटी स्टँडच्या दिशेने.
इकडे कोलमडून पडलेल्या जनीबाईला सावरायला लगेच कुंदा धावत आली.

तो दिवस आणि आजचा दिवस....  इतक्या दिवसात गावातल्या लोकांकडूनच दत्तूची खबरबात कळत होती.
कोणी म्हणे दुकानात कामाला लागलाय,  तर कोणी म्हणे कपडा मार्केटला मजूरी करतोय,  कसा का होईना तो लांब असुनही तिची नजर त्याच्यावर लक्ष ठेवून होती.
शेवटची माहीती मिळाली तेव्हा दारुमुळे त्याला कोणीही काम देत नव्हते म्हणून त्याने पाटी वाल्याचे काम सुरु केलेलं. दहा वीस रुपयात लोकांचे सामान इकडून तिकडे नेण्याचे काम तो करत होता.  कुंदाचा नवरा बाळारामला तो अधून मधून दिसायचा मुंबादेवी मंदिर परिसरात.
तिथेच असलेल्या वडापावच्या गाडीवरचे वडापाव खाऊन,  दारु पिऊन फुटपाथच्या कडेला झोपत असे.

परंतू तीन दिवसांपुर्वी त्या घटनेनंतर त्याचा कुठेच पत्ता नव्हता.  बाळाराम त्याला शोधण्याचा पुर्ण प्रयत्न करत होता पण त्याला ही तो सापडत नव्हता.  त्याचा फोनही बंद येत होता.  आता फक्त वाट पाहणंच तिच्या नशिबात होते.

" आत्ते..  ह्यांचा फोन आलाय,  तुला बोलावलंय फोनवर.  ये लवकर.  " कुंदा लगबग करुन सांगून गेली.
ती नेहमीप्रमाणे बोलली नाही.  नजरेला नजर न मिळवता गेली सुद्धा झटदिशी.

काठी टेकत ती कुंदाच्या घरात पोहचली.  कानाला कसा बसा रिसीव्हर लावला...
समोरुन येणारे शब्द ती नुसतेच ऐकत होती.
बाळाराम समोरुन बोलायचा थांबला तसा तिने फोन ठेवला.
कुंदाने तोंडाला पदर लावला होता.
तिच्याकडे न पाहता तीने कपाटाला टेकलेली काठी घेतली आणि दरवाज्यातून बाहेर गेली.
कुंदा तिच्याकडे बघतच राहीली.  जनीबाईच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.


आठ दिवसांनी तहसीलदार ऑफिसची गाडी जनीबाईंच्या घरासमोर उभी होती.  सोबत एक पोलिस व्हॅन,  आणि काही पत्रकार मंडळी.

एका न्युज चॅनेलचा पत्रकार कॅमेरासमोर उभा राहून बोलत होता.....

" मुंबादेवी मंदिरासमोरच्या बॉम्बस्फोटानंतर  तिसऱ्या दिवशी  मंदिरासमोरच्या इमारतीच्या गच्चीवर सापडलेला मृतदेह हा याच घरातल्या दत्ताराम पवार यांचा असून,  त्यांच्या घरी केवळ त्यांची म्हातारी आई श्रीमती जनीबाई पवार आहे.  तहसीलदार श्रीयुत पाटील यांनी लवकरात लवकर शासनाने बॉम्बस्फोटात मृत झालेल्या लोकांना सरकारने जाहीर केलेली रक्कम रुपये दहा लाख श्रीमती जनीबाई पवारांना देण्यात येईल असे सांगितले आहे. कॅमेरामन सुधांशू सोबत वार्ताहर संदीप..ग्रामीण महाराष्ट्र न्युज "

No comments:

Post a Comment