..... कायमची अद्दल .....
..... कायमची अद्दल .....
तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या एका खुर्चीत कृष्णा पाटील डोक्याला हात लावून बसले होते. सोबत नेहमी सोबत असणारा हरकाम्या पांडू देखील होता.
इन्सपेक्टर सावंत त्यांच्या आधी आलेल्या मारामारीच्या प्रकरणाच्या पकडून आणलेल्या लोकांना समज देत होते. त्यांची नजर सुद्धा पाटलांकडे आणि पांडूकडे गेली होती.
" दोन मिनीटे बसा.. यांचे आटोपतो मग निवांत बोलू.. " असं सांगून त्यांनी पाटलांना बसायला सांगितले होते.
मारामारी करुन तोंड सुजलेल्या दोन तरुणांकडे बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" हे बघा.. कंप्लेंट रजिस्टर केलीत तर उगाच सर्वांना त्रास होईल. क्रॉस कंप्लेंट घेऊन मी हे प्रकरण सरळ कोर्टाकडे वर्ग करेन आणि मग तुमच्या कोर्टाच्या खेपा वाढतील. कोर्ट कुठे आहे माहीत आहे ना? डायरेक्ट जिल्ह्याला...
तीन तास.. साडे तीनशे रुपये एका बाजूचा प्रवास.. समजूतदारपणे आणि विचारपुर्वक निर्णय घ्या. वाद, भांडण तंटे गावात होतंच राहतील. पण या दोन तरुणांची नावे रिकॉर्डवर येतील. मग पुढे ते त्रासदायक होईल. नोकरी - धंद्यात किती अडचणी येतील याचा अंदाज तरी आहे का तुम्हा लोकांना... बोला काय करु? "
या शब्दांनी दोन्ही गटात कमालीची शांतता पसरली. दोन्ही गटातले जाणती मंडळी एकमेकांसोबत कुजबूजू लागली.
बाण वर्मावर लागलाय हे समजून सावंत गालातल्या गालात हसत होते.
" तुमचं बरोबर आहे साहेब.
आम्ही तक्रार मागे घेतो. " एकजण शांतपणे बोलला.
" बरोबर.. लहान सहान वाद गावातच मिटवायचे. उगाच एवढा खर्च करुन तालुक्याला येता आणि नुकसान करुन घेता.. चला आता जा. " दोन्ही गटांच्या माणसांना समज देऊन जायला सांगून त्यांनी पाटलांकडे पाहीलं.
पाटील अजूनही डोक्याला हात लावून बसले होते.
" या पाटील साहेब.. भरपूर चिंता दिसतेय तुम्हाला. काय झालं? " बसण्यासाठीची खुर्ची मागे सरकवत सावंत बोलले.
कृष्णा पाटलांचे प्रस्थ फार मोठे होते. तालुक्यात " धवलक्रांती " आणण्याचे मोठे काम कृष्णा पाटील यांच्यामुळे झाले होते. संपुर्ण तालुका दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला होता. पाटलांचे राजकीय वर्तुळातही चांगलेच वजन होते. सभापती, बिडीओ, तहसीलदार यांच्याशी सुद्धा चांगले संबंध होते. सावंतानी सर्व माहीती काढली होती. त्यामुळे अशा वजनदार माणसाला प्रत्यक्ष स्वतःला पोलीस स्टेशनला यावे लागतेय म्हणजे, मामला नक्कीच काहीतरी गंभीर असावा.
" सावंत साहेब.. नमस्कार.
मी कृष्णा पाटील..
आपण भेटलो होतो. आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी. आठवतंय ना? " पाटलांनी ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला.
" हो.. पाटील साहेब.. आठवतंय की.. तुमच्या घरीच तर जेवलो आपण सर्व. अतिशय सुंदर जेवण केलेलं वहिनीसाहेबांनी. आजही ती पुरणपोळी आठवते मला. मऊशार काठांची.. गोड दुधात किती सुंदर लागली होती. चव पुन्हा जिभेवर आली पहा. "
सावंतानी ओळख पक्की असल्याचाच निर्वाळा दिला.
पाटील आता जरा सावरले आणि चाचरत बोलले
" साहेब.. चोरी होतेय... रोज... "
" रोज? कशाची? " सावंतानी प्रश्न केला.
" हे बघा.. आपल्या गोठ्यात ७० गाई, ४० म्हशी आहेत. भरपूर दुध दुभते आहे. एक एक गाय १५-१८ लिटर दुध देते म्हशी तर २० लिटर पार करतात..... "
" हो हे तुम्ही सांगितले होते, दौऱ्याच्या वेळी. तुमचं बघूनच, तुमच्या मदतीनेच तर तालुकाभर लोकांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. आज तालूका तुम्हाला यागोष्टीसाठी धन्यवाद देतोच की. " सावंतांच्या डोळ्यात पाटलांविषयीचा आदर दिसत होता.
" हो.. पण साहेब गेले काही महीने.. गोठ्यातून दुध चोरी होतेय... " पाटलांच्या कपाळावरची चिंतेची आठी अधिक गडद झाली.
" दुधाची चोरी? म्हणजे दुध कोणी काढून नेतं की काय? " सावंतानी हसून विचारलं.
" हो सावंत साहेब... दिवसाला तीनदा दुध काढणी होते. काही गायींची थानं सकाळच्या वेळी रिकामी असतात. कोणीतरी गुपचूप येऊन दुध काढून घेऊन जातंय.
रोजचे १००-१५० लिटर कमी येतंय. " पाटलांनी डोक्याला हात लावला.
" अरे बापरे रोज चार पाच हजाराचे नुकसानच की थेट.. किती दिवस चाललंय हे? " टेबलावरचे पेन उचलत समोरची वही उघडून सावंतांनी प्रश्न केला.
" म्हणजे बघा लक्षात येऊन तीन महिने झाले. त्याआधी किती महीने चाललंय हे याचा अंदाज नाही. दुधाचा हिशोब आमची ही सांभाळते. तिला समजलं नाही पैसे कमी येताहेत ते.. तीन महिन्यापुर्वी सहज म्हणून विचारलं तेव्हा समजलं की काहीतरी गडबड आहे.
म्हणून एक दिवस मी स्वतःच दुध काढायला बसलो. तर दहा गाईंची थानं आधीच रिकामी. कोणीतरी काढून नेलेले दुध. खुप प्रयत्न केला.. रात्री माणसं पण लक्ष ठेवायच्या कामाला ठेवली पण चोरी व्हायची काही थांबेना. एकदा चोर सापडू दे.. अशी काही धुलाई करतो त्याची की कायमची अद्दल घडेल त्याला " पाटलांच्या रागाचा पारा चढला होता.
" तुम्ही सांगताय त्यावरुन चोर तुमच्या खात्रीतला आणि जवळचाच दिसतोय. " सावंतांचा इतक्या वर्षाचा पोलिसातला अनुभव बोलू लागला. त्यांची नजर बाजूला उभ्या असलेल्या पांडूकडे गेली. पांडू काहीसा गडबडला.. हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखलं.
" नाही.. हो घरातला माणूस कसा चोरी करेल? सर्व घरातच असतात की.. गोठा लांब आहे घरापासून. आणि कमी असतं तर ठिक आहे १००-१५० लिटर म्हणजे काही कमी नाही. घरातला असता तर ते दुध दिसलंच असतं की कुठेना कुठे? " पाटलांनी नकारार्थी मान हलवली.
" तसं नाही..
जो कोणी चोर आहे. त्याला तुमच्या जवळचाच माहीती पुरवतो आणि चोर आपलं काम साधून जातो.
मला प्रश्न हा पडलाय की एवढं दुध ते नेत कसे असतील? " डोके खाजवतं सावंतांनी समोरच्या वहीत काहीतरी लिहीलं.
" हा तुमचा हरकाम्या ना? " पांडूकडे पेन दाखवून सावंतांनी विचारलं.
" नाव काय रे तुझं? " आवाजात जरब आणून सावंतानी विचारलं.
" जी सरकार.. पांडू नाव माझं. " घाबरत घाबरत पांडूने नाव सांगितले.
" जा जरा बाहेरच्या खुर्चीवर बस.. तुझी गरज लागली की बोलवतो तुला " सावंतांनी हुकूम सोडला.
" जी सरकार.. मी जातो बाहेर " बोलून लगेच पांडू आज्ञाधारकपणे बाहेर गेला.
सावंत काही बोलणार त्याअगोदरच....
" थकलो मी शोध घेऊन. आता तुम्हीच घ्या शोध.. चोर पकडून फक्त आमच्या हाती द्या. पुढे काय करायचं ते आम्ही बघू. " आवळलेल्या मुठ्या पाटलांनी टेबलावर आपटल्या.
" पाटील साहेब.. शांत व्हा.. आपण घेऊ शोध.. पण तुम्ही कायदा हाती घ्यायचा नाही. मला सांगा किती माणसं कामाला आहेत? कोणत्या वेळेला ते ही सांगा. " पेन सरसावून सावंतानी लिहायला घेतलं..
" हे बघा.. एकूण सहा माणसं कामाला आहेत गोठ्याच्या.
श्रीपती , गणपत, धनाजी, विठोबा, गुणा आणि बाळू. सगळी विश्वासातली आहेत. " पाटलांनी शांतपणे सांगितले.
" ओके.. मग सांगा..
या सहा पैकी गेल्या तीन महिन्यात कोणाचे राहणीमान बदललंय? नवीन कपडे, दागिने असं काही? " सावंतानी पुन्हा वहीत लिहिले.
" नाही... असं काहीच नाही. सर्व साधेच आहेत. साधी माणसे आहेत हो.. संशयाला जागाच नाही अजिबात.... या माणंसापैकी चोरी करणारे कोणीच नसेल.. चोर कोणीतरी बाहेरचाच आहे. " पाटलांनी निराशेने मान हलवली.
" मी तुम्हाला एक उपाय सांगतो... कराल?
पण ही गोष्ट अत्यंत सावधपणे करावी लागेल. ही गोष्ट फक्त तुमच्या आणि माझ्यातच.. घरी कोणालाही सांगू नका.. पांडूला नाही की अगदी वहिनीसाहेबांनाही नाही... समजलं? " सावंताच्या डोळ्यात खोडकरपणा दिसत होता.
" काय म्हणता? चोर पकडला जाईल? " पाटलांच्या चेहरा खुलला होता.
" नुसताच पकडला जाणार नाही.. कायमची अद्दलही घडेल.. " पेन वहीत ठेवून सावंतांनी वही बंद केली.
आणि पुढे बोलू लागले.
.........................
बरोबर चौथ्या दिवशी..
कृष्णा पाटील दोन जखमी तरुणासोबत अजून तीन चार माणसांना घेऊन पोलीस स्टेशनला येताना दिसले..
" नमस्कार पाटील साहेब.. सापडला का चोर?
पण मी तुम्हाला सांगितलेलं की कायदा हातात घेऊ नका. किती मारलंत यांना? सांगा बरं काय झालं ते? " जखमी तरुणांना न्याहाळत खुर्चीवर बसत सावंत बोलले.
" तुम्ही सांगितले तसंच केलं साहेब.. आणि बघा चोर सापडले.
हे दोघं चोर होते हा बाळूचा भाऊ सजन . आणि हा गुणाचा मेव्हणा सदा.. " पाटील हसत हसत सांगत होते.
" अरे व्वा.. मग? आता यांना शिक्षा मी देऊ की तुम्ही दिलीय ती पुरेसी आहे? " सावंतानी हसून विचारलं.
" अहो आम्ही यांना हातसुद्धा लावला नाही.
हे दोघं बाळू आणि गुणाकडून माहीती काढायचे आणि कोणी नसताना चोरी करायचे. चोरीसाठी सायकल वापरायचे त्यामुळे आवाजही व्हायचा नाही. सायकल सुद्धा लांब उभे करायचे त्यामुळे सायकलचे ठसे सुद्धा यायचे नाहीत गोठ्याजवळ. " पाटील सर्व माहीती सांगत सुटले.
" हो... हो... जरा हळू की.. बेतानं सांगा जरा पाटीलसाहेब..
मला सांगा कसं जमवलंत ते आधी? " सावंत संपुर्ण घटनाक्रम ऐकायला उत्सुक होते.
" म्हणजे हे बघा.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं.
आज जागरणाला कोणी नको असं मुद्दामच सांगितलं आणि मी तालुक्याला जातोय मुक्कामी असं सांगून वाड्याच्या मागच्या खोपीत लपून बसलो.
पहाटे साडेतीनच्या सुमारास हे दोघं सायकल घेऊन आले. दबक्या पावलाने आले आणि गाईंचे दुध काढू लागले.
मी गुपचूप त्यांना पाहत होतो. इतक्यात एकदम ओरडण्याचा आवाज आला. बघता बघता गोठ्यात गोंधळ सुरु झाला. या दोघांचा आरडा ओरडा आणि किंकाळ्या भरुन गेल्या.
शेवटी मीच बॅटरी सुरु केली आणि या दोघांना बाहेर काढलं.. पण तो पर्यंत यांना खुप मार लागला होता. " पाटील वेड्यासारखे हसत होते.
" वा.. वा.. पाटील.. हे तर पुर्ण प्लॅन प्रमाणेच झालं की.. यांना आधी हॉस्पिटलला न्यावे लागेल. दवापट्टी केल्यावर बघू काय करायचं ते... काय.. रे?
कायमची अद्दल घडली का रे?? " मान खाली घालून रडणाऱ्या आणि विव्हळणाऱ्या दोघांकडे पाहून सावंत हसले.
" आता तुम्ही यांना तुमचा पोलीसी खाक्या दाखवा.. तो वर मी जाऊन माझे राहीलेले अर्धवट काम करुन येतो.. " पाटील खुर्चीवरुन उठत बोलले.
" आता कुठे निघालात पाटीलसाहेब? जबाब वगैरे नोंदवून जा की. " सावंत त्यांना थांबवत बोलले.
" अहो. एवढ्या गाईंमध्ये त्या दहा बैलांनी काय धुमाकुळ घातला असेल याचा विचार करा की.. या दोघांनी " बैलाचं दुध " काढल्यावर यांची हाड खिळखीळी करुन ठेवलीत त्या बैलांनी. आता तिथे ते मोकाटच आहेत. त्यांना जरा त्यांच्या मालकांकडे देऊन येतो.. बरोबर ना? बाकी तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो.. असाच पोलीस अधिकारी पाहीजे तालुक्याला.. गुन्हेगारांना कायमची अद्दल घडवणारा. " पाटलांनी पोलीस स्टेशन हादरवून टाकणारा हास्याचा गडगडाट केला.
..... कायमची अद्दल .....
तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या एका खुर्चीत कृष्णा पाटील डोक्याला हात लावून बसले होते. सोबत नेहमी सोबत असणारा हरकाम्या पांडू देखील होता.
इन्सपेक्टर सावंत त्यांच्या आधी आलेल्या मारामारीच्या प्रकरणाच्या पकडून आणलेल्या लोकांना समज देत होते. त्यांची नजर सुद्धा पाटलांकडे आणि पांडूकडे गेली होती.
" दोन मिनीटे बसा.. यांचे आटोपतो मग निवांत बोलू.. " असं सांगून त्यांनी पाटलांना बसायला सांगितले होते.
मारामारी करुन तोंड सुजलेल्या दोन तरुणांकडे बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" हे बघा.. कंप्लेंट रजिस्टर केलीत तर उगाच सर्वांना त्रास होईल. क्रॉस कंप्लेंट घेऊन मी हे प्रकरण सरळ कोर्टाकडे वर्ग करेन आणि मग तुमच्या कोर्टाच्या खेपा वाढतील. कोर्ट कुठे आहे माहीत आहे ना? डायरेक्ट जिल्ह्याला...
तीन तास.. साडे तीनशे रुपये एका बाजूचा प्रवास.. समजूतदारपणे आणि विचारपुर्वक निर्णय घ्या. वाद, भांडण तंटे गावात होतंच राहतील. पण या दोन तरुणांची नावे रिकॉर्डवर येतील. मग पुढे ते त्रासदायक होईल. नोकरी - धंद्यात किती अडचणी येतील याचा अंदाज तरी आहे का तुम्हा लोकांना... बोला काय करु? "
या शब्दांनी दोन्ही गटात कमालीची शांतता पसरली. दोन्ही गटातले जाणती मंडळी एकमेकांसोबत कुजबूजू लागली.
बाण वर्मावर लागलाय हे समजून सावंत गालातल्या गालात हसत होते.
" तुमचं बरोबर आहे साहेब.
आम्ही तक्रार मागे घेतो. " एकजण शांतपणे बोलला.
" बरोबर.. लहान सहान वाद गावातच मिटवायचे. उगाच एवढा खर्च करुन तालुक्याला येता आणि नुकसान करुन घेता.. चला आता जा. " दोन्ही गटांच्या माणसांना समज देऊन जायला सांगून त्यांनी पाटलांकडे पाहीलं.
पाटील अजूनही डोक्याला हात लावून बसले होते.
" या पाटील साहेब.. भरपूर चिंता दिसतेय तुम्हाला. काय झालं? " बसण्यासाठीची खुर्ची मागे सरकवत सावंत बोलले.
कृष्णा पाटलांचे प्रस्थ फार मोठे होते. तालुक्यात " धवलक्रांती " आणण्याचे मोठे काम कृष्णा पाटील यांच्यामुळे झाले होते. संपुर्ण तालुका दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला होता. पाटलांचे राजकीय वर्तुळातही चांगलेच वजन होते. सभापती, बिडीओ, तहसीलदार यांच्याशी सुद्धा चांगले संबंध होते. सावंतानी सर्व माहीती काढली होती. त्यामुळे अशा वजनदार माणसाला प्रत्यक्ष स्वतःला पोलीस स्टेशनला यावे लागतेय म्हणजे, मामला नक्कीच काहीतरी गंभीर असावा.
" सावंत साहेब.. नमस्कार.
मी कृष्णा पाटील..
आपण भेटलो होतो. आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी. आठवतंय ना? " पाटलांनी ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला.
" हो.. पाटील साहेब.. आठवतंय की.. तुमच्या घरीच तर जेवलो आपण सर्व. अतिशय सुंदर जेवण केलेलं वहिनीसाहेबांनी. आजही ती पुरणपोळी आठवते मला. मऊशार काठांची.. गोड दुधात किती सुंदर लागली होती. चव पुन्हा जिभेवर आली पहा. "
सावंतानी ओळख पक्की असल्याचाच निर्वाळा दिला.
पाटील आता जरा सावरले आणि चाचरत बोलले
" साहेब.. चोरी होतेय... रोज... "
" रोज? कशाची? " सावंतानी प्रश्न केला.
" हे बघा.. आपल्या गोठ्यात ७० गाई, ४० म्हशी आहेत. भरपूर दुध दुभते आहे. एक एक गाय १५-१८ लिटर दुध देते म्हशी तर २० लिटर पार करतात..... "
" हो हे तुम्ही सांगितले होते, दौऱ्याच्या वेळी. तुमचं बघूनच, तुमच्या मदतीनेच तर तालुकाभर लोकांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. आज तालूका तुम्हाला यागोष्टीसाठी धन्यवाद देतोच की. " सावंतांच्या डोळ्यात पाटलांविषयीचा आदर दिसत होता.
" हो.. पण साहेब गेले काही महीने.. गोठ्यातून दुध चोरी होतेय... " पाटलांच्या कपाळावरची चिंतेची आठी अधिक गडद झाली.
" दुधाची चोरी? म्हणजे दुध कोणी काढून नेतं की काय? " सावंतानी हसून विचारलं.
" हो सावंत साहेब... दिवसाला तीनदा दुध काढणी होते. काही गायींची थानं सकाळच्या वेळी रिकामी असतात. कोणीतरी गुपचूप येऊन दुध काढून घेऊन जातंय.
रोजचे १००-१५० लिटर कमी येतंय. " पाटलांनी डोक्याला हात लावला.
" अरे बापरे रोज चार पाच हजाराचे नुकसानच की थेट.. किती दिवस चाललंय हे? " टेबलावरचे पेन उचलत समोरची वही उघडून सावंतांनी प्रश्न केला.
" म्हणजे बघा लक्षात येऊन तीन महिने झाले. त्याआधी किती महीने चाललंय हे याचा अंदाज नाही. दुधाचा हिशोब आमची ही सांभाळते. तिला समजलं नाही पैसे कमी येताहेत ते.. तीन महिन्यापुर्वी सहज म्हणून विचारलं तेव्हा समजलं की काहीतरी गडबड आहे.
म्हणून एक दिवस मी स्वतःच दुध काढायला बसलो. तर दहा गाईंची थानं आधीच रिकामी. कोणीतरी काढून नेलेले दुध. खुप प्रयत्न केला.. रात्री माणसं पण लक्ष ठेवायच्या कामाला ठेवली पण चोरी व्हायची काही थांबेना. एकदा चोर सापडू दे.. अशी काही धुलाई करतो त्याची की कायमची अद्दल घडेल त्याला " पाटलांच्या रागाचा पारा चढला होता.
" तुम्ही सांगताय त्यावरुन चोर तुमच्या खात्रीतला आणि जवळचाच दिसतोय. " सावंतांचा इतक्या वर्षाचा पोलिसातला अनुभव बोलू लागला. त्यांची नजर बाजूला उभ्या असलेल्या पांडूकडे गेली. पांडू काहीसा गडबडला.. हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखलं.
" नाही.. हो घरातला माणूस कसा चोरी करेल? सर्व घरातच असतात की.. गोठा लांब आहे घरापासून. आणि कमी असतं तर ठिक आहे १००-१५० लिटर म्हणजे काही कमी नाही. घरातला असता तर ते दुध दिसलंच असतं की कुठेना कुठे? " पाटलांनी नकारार्थी मान हलवली.
" तसं नाही..
जो कोणी चोर आहे. त्याला तुमच्या जवळचाच माहीती पुरवतो आणि चोर आपलं काम साधून जातो.
मला प्रश्न हा पडलाय की एवढं दुध ते नेत कसे असतील? " डोके खाजवतं सावंतांनी समोरच्या वहीत काहीतरी लिहीलं.
" हा तुमचा हरकाम्या ना? " पांडूकडे पेन दाखवून सावंतांनी विचारलं.
" नाव काय रे तुझं? " आवाजात जरब आणून सावंतानी विचारलं.
" जी सरकार.. पांडू नाव माझं. " घाबरत घाबरत पांडूने नाव सांगितले.
" जा जरा बाहेरच्या खुर्चीवर बस.. तुझी गरज लागली की बोलवतो तुला " सावंतांनी हुकूम सोडला.
" जी सरकार.. मी जातो बाहेर " बोलून लगेच पांडू आज्ञाधारकपणे बाहेर गेला.
सावंत काही बोलणार त्याअगोदरच....
" थकलो मी शोध घेऊन. आता तुम्हीच घ्या शोध.. चोर पकडून फक्त आमच्या हाती द्या. पुढे काय करायचं ते आम्ही बघू. " आवळलेल्या मुठ्या पाटलांनी टेबलावर आपटल्या.
" पाटील साहेब.. शांत व्हा.. आपण घेऊ शोध.. पण तुम्ही कायदा हाती घ्यायचा नाही. मला सांगा किती माणसं कामाला आहेत? कोणत्या वेळेला ते ही सांगा. " पेन सरसावून सावंतानी लिहायला घेतलं..
" हे बघा.. एकूण सहा माणसं कामाला आहेत गोठ्याच्या.
श्रीपती , गणपत, धनाजी, विठोबा, गुणा आणि बाळू. सगळी विश्वासातली आहेत. " पाटलांनी शांतपणे सांगितले.
" ओके.. मग सांगा..
या सहा पैकी गेल्या तीन महिन्यात कोणाचे राहणीमान बदललंय? नवीन कपडे, दागिने असं काही? " सावंतानी पुन्हा वहीत लिहिले.
" नाही... असं काहीच नाही. सर्व साधेच आहेत. साधी माणसे आहेत हो.. संशयाला जागाच नाही अजिबात.... या माणंसापैकी चोरी करणारे कोणीच नसेल.. चोर कोणीतरी बाहेरचाच आहे. " पाटलांनी निराशेने मान हलवली.
" मी तुम्हाला एक उपाय सांगतो... कराल?
पण ही गोष्ट अत्यंत सावधपणे करावी लागेल. ही गोष्ट फक्त तुमच्या आणि माझ्यातच.. घरी कोणालाही सांगू नका.. पांडूला नाही की अगदी वहिनीसाहेबांनाही नाही... समजलं? " सावंताच्या डोळ्यात खोडकरपणा दिसत होता.
" काय म्हणता? चोर पकडला जाईल? " पाटलांच्या चेहरा खुलला होता.
" नुसताच पकडला जाणार नाही.. कायमची अद्दलही घडेल.. " पेन वहीत ठेवून सावंतांनी वही बंद केली.
आणि पुढे बोलू लागले.
.........................
बरोबर चौथ्या दिवशी..
कृष्णा पाटील दोन जखमी तरुणासोबत अजून तीन चार माणसांना घेऊन पोलीस स्टेशनला येताना दिसले..
" नमस्कार पाटील साहेब.. सापडला का चोर?
पण मी तुम्हाला सांगितलेलं की कायदा हातात घेऊ नका. किती मारलंत यांना? सांगा बरं काय झालं ते? " जखमी तरुणांना न्याहाळत खुर्चीवर बसत सावंत बोलले.
" तुम्ही सांगितले तसंच केलं साहेब.. आणि बघा चोर सापडले.
हे दोघं चोर होते हा बाळूचा भाऊ सजन . आणि हा गुणाचा मेव्हणा सदा.. " पाटील हसत हसत सांगत होते.
" अरे व्वा.. मग? आता यांना शिक्षा मी देऊ की तुम्ही दिलीय ती पुरेसी आहे? " सावंतानी हसून विचारलं.
" अहो आम्ही यांना हातसुद्धा लावला नाही.
हे दोघं बाळू आणि गुणाकडून माहीती काढायचे आणि कोणी नसताना चोरी करायचे. चोरीसाठी सायकल वापरायचे त्यामुळे आवाजही व्हायचा नाही. सायकल सुद्धा लांब उभे करायचे त्यामुळे सायकलचे ठसे सुद्धा यायचे नाहीत गोठ्याजवळ. " पाटील सर्व माहीती सांगत सुटले.
" हो... हो... जरा हळू की.. बेतानं सांगा जरा पाटीलसाहेब..
मला सांगा कसं जमवलंत ते आधी? " सावंत संपुर्ण घटनाक्रम ऐकायला उत्सुक होते.
" म्हणजे हे बघा.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं.
आज जागरणाला कोणी नको असं मुद्दामच सांगितलं आणि मी तालुक्याला जातोय मुक्कामी असं सांगून वाड्याच्या मागच्या खोपीत लपून बसलो.
पहाटे साडेतीनच्या सुमारास हे दोघं सायकल घेऊन आले. दबक्या पावलाने आले आणि गाईंचे दुध काढू लागले.
मी गुपचूप त्यांना पाहत होतो. इतक्यात एकदम ओरडण्याचा आवाज आला. बघता बघता गोठ्यात गोंधळ सुरु झाला. या दोघांचा आरडा ओरडा आणि किंकाळ्या भरुन गेल्या.
शेवटी मीच बॅटरी सुरु केली आणि या दोघांना बाहेर काढलं.. पण तो पर्यंत यांना खुप मार लागला होता. " पाटील वेड्यासारखे हसत होते.
" वा.. वा.. पाटील.. हे तर पुर्ण प्लॅन प्रमाणेच झालं की.. यांना आधी हॉस्पिटलला न्यावे लागेल. दवापट्टी केल्यावर बघू काय करायचं ते... काय.. रे?
कायमची अद्दल घडली का रे?? " मान खाली घालून रडणाऱ्या आणि विव्हळणाऱ्या दोघांकडे पाहून सावंत हसले.
" आता तुम्ही यांना तुमचा पोलीसी खाक्या दाखवा.. तो वर मी जाऊन माझे राहीलेले अर्धवट काम करुन येतो.. " पाटील खुर्चीवरुन उठत बोलले.
" आता कुठे निघालात पाटीलसाहेब? जबाब वगैरे नोंदवून जा की. " सावंत त्यांना थांबवत बोलले.
" अहो. एवढ्या गाईंमध्ये त्या दहा बैलांनी काय धुमाकुळ घातला असेल याचा विचार करा की.. या दोघांनी " बैलाचं दुध " काढल्यावर यांची हाड खिळखीळी करुन ठेवलीत त्या बैलांनी. आता तिथे ते मोकाटच आहेत. त्यांना जरा त्यांच्या मालकांकडे देऊन येतो.. बरोबर ना? बाकी तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो.. असाच पोलीस अधिकारी पाहीजे तालुक्याला.. गुन्हेगारांना कायमची अद्दल घडवणारा. " पाटलांनी पोलीस स्टेशन हादरवून टाकणारा हास्याचा गडगडाट केला.